अभिषेक बच्चन, विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्या अभिनयाने सजलेला मनमर्जियॉं सिनेमा बॉक्स ऑफीसवर म्हणावा तितका यशस्वी ठरला नाही, पण यातील त्यांच्या भूमिकांचं बॉलिवूड आणि समिक्षकांनी बरंच कौतुक केलं. पण या सिनेमाबाबत आता एक रंजक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे यातील अभिषेक बच्चन हा या मेकर्सची पहिली पसंती नव्हता.
मनमर्जियॉं सिनेमासाठी अभिनेता आयुष्मान खुरानाला साईन करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे आयुष्मानने या सिनेमासाठी काही सीन्ससुध्दा शूट केले होते. विशेष म्हणजे यात त्याची दम लगाको हाईश्शची को-स्टार भूमी पेडणेकर झळकणार होती. पण निर्माते आनंद एल राय यांना निर्माते समीर शर्मा यांच्याद्वारे शूट करण्यात आलेले सीन्स आवडले नाहीत. मग त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना या सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी ऑनबोर्ड घेण्यात आलं.
अनुराग कश्यप हे ऑनबोर्ड आल्यानंतर त्यांनी आणि लेखिका कनिका ढिल्लो यांनी मिळून मनमर्जियॉंच्या स्क्रीनप्लेवर पुन्हा नव्याने काम सुरु केलं. त्यामुळे साहजिकच या सिनेमाची कास्टींगसुध्दा बदलण्यात आली आणि आयुष्यमान साकारत असलेली भूमिका अभिषेक बच्चनला मिळाली.