सहकुटुंब सहपरिवार ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर यांच्या केमिस्ट्रीने सजलेली ही मालिका व संपूर्ण कुटुंबाला एकत्र धरुन ठेवण्याचं मालिकेचं कथानक यामुळे या मालिकेला खुप प्रसिध्दी मिळतेय. या मालिकेतील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना आकर्षित करतंय. चार भाऊ, त्यांच्या पत्नी आणि आई अशा हसत्या-खेळत्या कुटुंबाला पाहून प्रत्येकाला आपल्या घराचंच प्रतिबिंब यात दिसतंय.
दादावर असलेलं दुकानाचं कर्ज आणि ते फेडलं नाही तर दुकान जप्त होण्याच्या भीती यामुळे मोरे कुटुंब चांगलंच हादरुन गेलंय. दुकानाच्या कर्जमाफीसाठी फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे पशाने त्या मालकाची माफी मागणं. पण पशा तयार असूनही दादा पशाला ही माफी मागण्यासाठी कोणाकडे नाक घासायला नकार देतो. त्यामुळे आपण घरासाठी आणि दुकानासाठी काहीच करु शकत नसल्याने हतबल झालेला पशा घर आणि गाव सोडून निघून गेल्याचे मालिकेत पाहायला मिळतंय. त्याला सर्वजण गावभर शोधतायत. पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नाहीय.
आता त्याची बायको अंजलीनेसुध्दा पशाला माफ न केल्याचं प्रकरणंही त्यात ताजं आहे. या सर्व घटनांमध्ये जाऊबाई अवनीने अंजलीलाच पशाने घर सोडून जाण्याबाबत जबाबदार धरलंय. त्यामुळे आता अंजली काय पाऊल उचलणार, ती त्याला शोधून काढणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं सहकुटुंब सहपरिवार मालिकेत सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर मिळतील.