By  
on  

'तरुणांमध्ये देशप्रेमाची जागृती होणे आवश्यक' - कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर

आपले सैन्य आपल्या संरक्षणासाठी सीमेवर दिवसरात्र कार्यरत असते, या सैनिकाप्रती व देशाप्रती देशप्रेम आपल्या मनात सतत असणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांमध्ये देशप्रेमाची जाणीव जागृती येणे आवश्यक आहे असे उद्गार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी काढले. ते मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रणाम भारत कला अभियान यांच्या वतीने तरुणांमध्ये "नेशन फर्स्ट", ची जाणीव जागृती निर्माण करणारा व भारतीय सैन्य दलाला मानवंदना देणारा "जागते रहो" हा कार्यक्रम सादर करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सैनिकासाठी कार्य करणाऱ्या लक्ष्य फौंडेशन च्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी भारतीय सैन्य जे सीमेवर कार्य करते. या सैन्यदलाचे प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शन छायाचित्र व चित्रफितीद्वारे त्यांनी तरुणांना घडविले. आपले सैन्यदल काश्मीर, कारगिल, द्रास्, सियाचीन, अरुणाचल प्रदेश अशा अनेक खडतर ठिकाणी सतत २४ तास डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा करण्याचे कार्य कसे करतात याचे यथार्थ दर्शन अनुराधा प्रभुदेसाई यांनी घडविले.

तसेच वीरमाता अनुराधा गोरे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या युद्धामध्ये तसेच युद्धानंतर ते आजपर्यंत युद्धजन्य परिस्थितीत लाखो सैनिक मृत्यू व जखमी झालेले आहेत. यातील जखमी सैनिक अनेक वेळेस अपंग होतात, परंतु ते स्वतःला अपंग मानत नाहीत. तसेच अनेक युद्धामध्ये मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी यांनाही मी भेटले त्यावेळी त्यांचे म्हणणे असे आहे कि, आम्हाला सहानुभूती देण्यापेक्षा आम्हाला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या, सर्व भारताच्या सरहद्दीवर मी स्वतः जाऊन आले आहे. त्यावेळी सैनिक म्हणतात, यावेळेस माझा मृत्यू झाला तरी पुढील जन्म हा सैनिकाचाच मिळाला पाहिजे, अशी भावना सैनिकांमध्ये असते, अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आणि तरुणांमध्ये असली पाहिजे. तरुणांमध्ये देशाप्रती "नेशन फर्स्ट" ही भावना निर्माण करणे आवश्यक आहे.

यानंतर भारतीय सैन्य दलातील निवृत्त एअर मार्शल सुनील सोमण, निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन व निवृत्त व्हाईस अॅडमिरल अभय कर्वे यांनी सैन्यदल, वायुसेना व नौसेना मधील सैनिकांची सद्यस्थिती, त्यांचे कार्य याबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी बोलताना मेजर जनरल शिशिर महाजन म्हणाले, प्रत्यक्ष युद्धानंतर आजपर्यंत भारतीय सैनिक दररोज लढाई करीत आहेत, यामध्ये मृत्यू होणाऱ्या सैनिकांची संख्या ही युद्धामध्ये मृत्यू पावलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे. सैन्याला लोकांच्या सहानुभूतीपेक्षा त्यांच्याविषयी जाणीव असणे आवश्यक वाटते. तसेच आपल्या पाठ्यपुस्तकात १९४७ पासून झालेल्या अनेक युद्धांच्या कथा असणे आवश्यक आहे. वायुसेनेविषयी बोलताना निवृत्त एअर मार्शल सुनील सोमण म्हणाले भारताचे वायुदल २४ तास अलर्ट असते, एखादा संदेश आल्यास ३ मिनिटांच्या आत विविध विमानतळावरून अनेक विमान तात्काळ लक्ष्याच्या दिशेने झेप घेतात. पुलवामा घटनेनंतर भारतीय वायू सेनेने तात्काळ झेप घेऊन पाकिस्तानी हवाई हल्ल्याला परतवून लावले.

नौदलाविषयी बोलताना निवृत्त व्हाईस अॅडमिरल अभय कर्वे म्हणाले समुद्रामध्ये विशेषता अरेबियन समुद्रामध्ये आपली जहाजे २४ तास तयार असतात. समुद्राला सीमा नसल्यामुळे समुद्रातील विविध प्रकारची जहाजे ओळखून त्यावर तात्काळ कारवाई केली जाते. याप्रसंगी सिने व नाट्य कलाकार अभिराम भडकमकर यांनी "जागते रहो" या कार्यक्रमाची कल्पना विशद केली. ते म्हणाले या देशाप्रती व सैनिकाप्रती कलाकारांमध्ये जाणीव असते. म्हणूनच सिने व नाट्यक्षेत्रातून अनेक कलाकारांच्या सहकार्यामुळे "जागते रहो" या कार्यक्रमाची निर्मिती झाली. सदर कार्यक्रमामध्ये गायक रविंद्र साठे व इतर कलाकारांनी याप्रसंगी देशभक्तीपर गीते सादर केली.

मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ रविंद्र कुलकर्णी व मुंबई विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक मुकादम यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची संकल्पना पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर, अभिराम भडकमकर, राजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, डॉ. अमोल देशमुख, कुणाल रेगे व अभिषेक मराठे यांची होती. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, सिने अभिनेत्री किशोरी शहाणे-विज ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे समन्वयक दूर व मुक्त अध्ययन  संस्थेच्या संचालिका डॉ. शेफाली पंड्या व प्रा. मंदार भानुशे हे होते.

Recommended

PeepingMoon Exclusive