सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय परिस्थितीवर जनसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या सेलेब्रिटी पर्यंत प्रत्येक जण आपापली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यात काल राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी या पदासाठी पात्र नाहीये, अयोग्य आहे, तर मी हे पद सोडायला तयार असल्याचे त्यांनी म्हटलं..
मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. यात अभिनेते किरण माने यांनी देखील आपलं मत मांडलं आहे. किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर, विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतंच किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.
"अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले! एवढं घडूनही 'Cool' आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्या, आक्रस्ताळेपणा करणार्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्याला इतिहास लक्षात ठेवतो", असे किरण माने यांनी म्हटलं आहे.
दरम्यान किरण माने हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडकपणे व्यक्तव्य करण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांची मतं, विचार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.