भारताचा स्वातंत्र्य इतिहास अनेक घटनांनी परिपूर्ण आहे. अनेक क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं आहे. पुण्यातही त्यावेळी एका थरारक घटनेने देशभर इंग्रजांविरुद्ध प्रेरणा दिली.
दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या तिघा चाफेकर बंधूंनी या पुण्याच्या गणेशखिंडीत 22 जून 1897 रोजी जुलमी ब्रिटीश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँडचा वध केला.
देशात उफाळलेल्या असंतोषाचे प्रतीक म्हणून या थरारक प्रसंगाची गणना केली जाते. स्वातंत्र्य संग्रामात इंधन ओतण्याचं काम करणाऱ्या या घटनेचं ऐतिहासिक मोल मोठं आहे.
नेमकी हीच घटना घेऊन झी 5 एक नवी वेबसिरीज घेऊन येत आहे. ‘गोंद्या आला रे’ असं या वेबसिरीजचं नाव आहे.
रॅंडच्या वधावर आधारित असलेल्या या वेबसिरीजमध्ये भुषण प्रधान, पल्लवी पाटील, शिवराज वायचळ, सुनील बर्वे, शाल्व किंजवडेकर, आनंद इंगळे, भारत दाभोळकर, प्रज्ञा सिंग यांच्या भूमिका आहेत. या वेबसिरीजमधील भूमिकेसाठी भुषण, सुनील, शिवराज यांनी आपला लूक बदलला असून केसांना राम राम ठोकला आहे.. ही वेबसिरीज 15 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येणार आहे.