दिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे-जोशी
कलाकार: सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, सविता प्रभूणे, पल्लवी पाटील अंगद म्हसकर
वेळ : 2 तास 48 मिनिटे
रेटींग : 3 मून
मराठी सिनेसृष्टीत भयपट किंवा सस्पेन्स-थ्रीलर सिनेम तसे फारच कमी प्रमाणात तयार होतात. सध्या अशा सिनेमांचं प्रमाण हळूहळू वाढू लागलं आहे. कारण प्रेक्षकवर्गाकडूनसुध्दा अशा सिनेमांबाबत चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सविता दामोदर परांजपे या प्रसिध्द नाटकावर आधारित हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आणि मोठ्या पडद्यावर त्याचं सादरीकरणसुध्दा तितक्याच ताकदीने करण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाकडून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. हा सिनेमासुध्दा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतोय.
कथानक
शरद अभ्यंकर (सुबोध भावे) आणि कुसूम अभ्यंकर (तृप्ती तोरडमल) या दोघांचा सुखी संसार सुरु असतो. पण काही ना काही कारणाने ती नेहमी आजारी असते आणि चित्रविचत्र वागत असते. अनेक उपचार करुनसुध्दा तिच्यात काहीच सुधारणा होत नाही. तिला काही बाहेरची भूतबाधा किंवा कोणी झपाटले आहे का हे पडताळून पाहण्यासाठी अशोकला (राकेश बापट) शरद बोलावतो. अशोक जेव्हा कुसुमला बरं करण्यासाटी तिच्याशी संवांद साधायला सुरू करतो आणि तु कोण आहेस अशी, विचारणा करतो तेव्हा कुसुम आपण सविता दामोदर परांजपे असल्याचं सांगते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अशा अचानक चमत्कारिक आणि भीतीदायक घटना घडू लागतात. त्यामुळे त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळतं. काही काळानंतर यामागील गूढ आणखी वाढत जाते. पुढे सविता दामोदर परांजपे कोण आहे आणि ती या दोघांच्या सुखी संसारात का आली हे, सिनेमात पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
दिग्दर्शन
सर्वप्रथम नमूद करण्यासारखं म्हणजे प्रेक्षकांना शेवटपर्यंत रहस्य कायम ठेवत त्यांची उत्कंठा वाढवण्यात आणि खुर्चीला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी संपूर्ण यश मिळवलं आहे.
अभिनय
सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत त्यांना पुरेपूर न्याय दिला आहे. तृप्तीचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तिने आपलं नवखेपण कुठेच जाणवू दिलं नाही.
संगीत
संगीत हे या सिनेमाची जान आहे. क्षणोक्षणी उत्कंठा आणि पुढे काय होणार हे विचार करायला भाग पाडण्यात या सिनेमाचा फार मोठा वाटा आहे. कथेतील भयानकतेची जाणीव संगीतामुळे कायम राहते.
सिनेमा का पाहावा?
भय आणि उत्कंठा वाढवणारा हा सिनेमा प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच एक हटके कथा तुम्ही मोठ्या पडद्यावर अनुभवणं एन्जॉय करू शकता.