‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका आता अंतिम टप्प्यात आहे. या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाल्यापासून मालिकेने भावनिक वळण घेतलं आहे. या मालिकेतील सोयराबाईंची भूमिका साकारणा-या स्नेहलता वसईकर यांनी अलीकडेच एक भावनिक मेसेज शेअर केला आहे. त्यांनी वढू येथील संभाजी महारांजाच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी एक भावनिक मेसेज शेअर केला आहे. त्या म्हणतात,
समाधान अध्याय पूर्तीचा, अभिमान कर्तव्यपूर्तीचा, भूमिकेस न्याय देण्यासाठीच्या संघर्ष पूर्तीचा..... काल श्रीक्षेत्र वढू मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी क्षेत्रास नतमस्तक होण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची संपूर्ण टीम रुजू झाली होती.
काही क्षण सुन्न झाले होते सगळेच....कळेना या भावनेला नक्की काय म्हणावे पण अनाहुतपणे अभिमानाने उर भरून येत होता या मालिकेतून शंभू चरित्र उलगडताना नकळत आयुष्यातल्या संकटांच्या नजरेत नजर घालून सामोरे जाण्याची ताकद मिळाली, शेवटच्या क्षणापर्यंत न हरण्याची प्रेरणा मिळाली.
काल चित्रित झालेले हे अमूल्य क्षण सर्व शंभूप्रेमी यांना आणि प्रेक्षकांना मालिकेच्या शेवटच्या भागात पाहायला मिळतील त्यामुळे शेवटच्या भागापर्यंत मालिकेशी एकनिष्ठ राहुयात आणि @amolrkolhe म्हणाले तसं "प्रतिकाहून महत्वाची आहे ती प्रेरणा"! स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे उद्दिष्ट ध्यानात ठेवून शिव विचारांची आणि शंभू विचारांची प्रेरणा ही प्रत्येकाच्या वर्तणुकीतून स्पष्ट झाली तर हेच या मालिकेचं सर्वात मोठे यश असेल.....’
या मालिकेत संभाजी राजांना कैद होते या एपिसोडसाठी नेटिझन्सही भावनिक झाल्याचं दिसून येतं.