सध्या करोनाने जगभर व्याप्ती वाढवली आहे. अनेक देश करोनाच्या कचाट्यात आहे. सिनेमा, मालिका वेबसिरीज यांचं शुटिंगही थांबवलं आहे. याशिवाय राज्यभर यात्रा, धार्मिक उत्सव यांच्यावरही बंदी आहे. यामध्ये कलाकारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. लोकसभेत शुन्य प्रहरात याविषयी मत मांडताना डॉ. अमोल कोल्हे यांनी कलाकारांना मदत देण्याची मागणी केली आहे.
याविषयी प्रश्न मांडताना अमोल म्हणतात, ‘महाराष्ट्राला तमाशा आणि इतर लोककलांची परंपरा आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा ते बुद्ध पौर्णिमापर्यंत अनेक तमाशा आणि इतर लोककलांचे कार्यक्रम होत असतात. पण सध्या करोनाच्या संसर्गामुळे हे सर्व बंद असल्याने कलाकारांना आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत आहे.
याशिवाय सिनेइंडस्ट्रीचं हब असलेल्या मुंबईमध्ये मालिका, वेबसिरीज आणि सिनेमाचं शुटिंग बंद असल्याने या निर्मात्यांनाही नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे करोना संदर्भात केंद्र सरकारने विमा कंपन्याना सूचना देण्यात आलेल्या नाहीत. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून या संदर्भात सहकार्य करावे.’ अशी मागणी यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.