नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तान्हाजी या सिनेमातून पडद्यावर पाहायला मिळाला. हा इतिहास सगळ्यांसमोर येण्यासाठी सिनेमा तर आला पण ते जिथे राहायचे जे त्यांचं जन्मस्थान आहे त्याच्या जीर्णोद्धाराचा निर्णय आता समोर आला आहे.
महाराष्ट्रात असलेल्या 'उमरठ' या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे हे जन्मस्थान असून याच गावात त्यांच्या घराची वास्तू भूमिगत झाली आहे. या भूमिगत झालेल्या वास्तूच्या जागी नव्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवण्यात आले आहे. याच गावात लहानाचे मोठे झालेल्या आणि नरवीर तानाजी मालुसरे विद्यालायमध्ये शिक्षण घेतलेल्या हरीओम घाडगे यांनी हे ठरवले आहे. हरीओम घाडगे यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने या वास्तूच्या भूमीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
हरीओम घाडगे यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांना नेहमीच स्फुर्ती आणि प्रेरणा स्थान मानलं आहे. त्यांच ऋण कुठे तरी फेडाव असं त्यांना वाटत असताना शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तान्हाजी मालुसरेंच्या घराच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे त्यांनी ठरवले आणि भूमीपूजनही केले. या वास्तूला बांधण्यासाठी हरीओम घाडगे यांनी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातील सहकलाकारांना, टीमला घेऊन तिथे श्रमदान केले.
उमरठच्या गावकऱ्यांनीही त्या कार्यात सहभाग घेऊन सहकार्य केले. हरिओम घाडगे यांचा एक कलाकार आणि निर्माता म्हणून प्रवास सुरु होण्याआधी उमरठ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची वास्तू उभारावी ही त्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच नरवीर तानाजी मालुसरेंच्या वास्तूला त्यानीं प्राधान्य दिले. शिवजयंतीनिम्मित केलेल्या भूमीपूजनानंतर त्यांनी त्यांची कारकीर्द एक निर्माता आणि कलाकार म्हणून सुरू करत असल्याची घोषणा सुद्धा केली. त्यांच्या 'हरी-ओम' या चित्रपटाच्या संहितेचे पूजन आणि अनावरण ही यावेळी करण्यात आले.