'प्रेमाला वयाचं बंधन नसतं' असं म्हणतात. झी मराठीने नेमकी हीच टॅग लाईन वापरून रसिकांच्या भेटीला एक मालिका आणली. बघता बघता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी जागा निर्माण केली. ही मालिका म्हणजे 'तुला पाहते रे'. या मालिकेने अलीकडेच शंभर भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.
अवखळ, अल्लड ईशा आणि समंजस, विचारी प्रौढ विक्रम सरंजामे यांच्यात फुलणाऱ्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत दाखवली आहे. गिरीश मोहिते यांनी या वेगळ्या वाटेवरच्या लव्हस्टोरीला उत्तम दिग्दर्शनाने सजवलं आहे. सध्या ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. मायरा, झेंडे यांच्या कटकारस्थानातून नातं जपण्याची कसरत ईशा आणि विक्रमला करावी लागत आहे. त्यात आता जालिंदरचीही भर पडली आहे. त्यामुळे ईशा आणि विक्रमसाठी आगामी काळ हा अडथळ्यांची शर्यत असणार आहे. अर्थात एकमेकांवर असलेल्या अतूट विश्वासामूळे त्यातून मार्ग काढणं त्यांना अवघड जाणार नाही. झेंडे आणि मायरानी उभे केलेल्या अनेक अडथळ्यांना पार करत ईशा कंपनीतही यशाची शिखरं काबीज करताना दिसून येत आहे. तसेच झेंडेंच्या अनेक कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्याची जबाबदारीही तिच्यावर आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1069899171056865281
त्यामुळे येत्या काही एपिसोडसमध्ये ईशा झेंडेंच्या परीक्षेत उत्तीर्ण होते का हे पाहणं रंजक ठरेल. याशिवाय ईशाच्या मदतीला रुपाली आणि बिपीन असल्याने तिच्यासाठी हा प्रवास तितकासा अवघड नसेल. सध्या तरी प्रेक्षकांकडून 'तुला पाहते रे'ने 100 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. या मालिकेने अजून बऱ्याच एपिसोड्सचा टप्पा पार करावा अशी अपेक्षाही केली जात आहे.