यंदा सर्वच उत्सवांवर करोना संकट आणि लॉकडाऊनचं सावट आहे. त्यात जन्माष्टमीनंतर सर्वत्र हर्षोल्हास पसरवणारा आपला लाडका सण दहीहंडी येतो. वर्षभर सराव करणारी गोविंदापथकं या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. पण आज दहीहंडी साजरी होऊ शकत नसल्याची खंत प्रत्येक गोविंदाच्या मनात खदखदल्याशिवाय राहणार नाही.
गेली कित्येक वर्ष दहीहंडी उत्सवाला एखाद्या इव्हेंट्चं स्वरुप आलं आहे. जास्तीत जास्त थरांची दहीहंडी रचणा-या पथकाला बक्षिसं जाहीर करण्यात येतात. तसेच अनेक मान्यवर सेलिब्रिटींची उपस्थिती, गाण्यांच्या कार्यक्रमाची रेलचेल असं सारंकाही असायचं. त्या चढा-ओढीच्या इर्षेत एक वेगळीच धम्माल गोविंदा अनुभवायचे. पण करोना महामारीत मात्र असं काहीच यंदा होऊ शकत नाही, म्हणूनच एक सवाल मराठी सिनेसृष्टीचे प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला आहे.
केदार शिंदे म्हणतात, "यावर्षी दहीहंडी नाही. कुठलेच सण मोठ्या प्रमाणात साजरे करता येत नाहीएत. पण कोटी कोटीची पारीतोषिकं दरवर्षी जाहीर करणारे राजकारणी brands, या वर्षी ती रक्कम गोविंदा मंडळात का वाटत नाहीत? या वर्षी त्यांनी या “थराला” जाऊ "
केदार शिंदेंनी शो ऑफ करणा-या सर्वच राजकारण्यांना चांगलाच सल्ला दिला आहे. दरवर्षी गोविंदा पथकं आपला जीव धोक्यात घालून राजकारण्यांची इर्षा शमविण्यासाठी हे थर रचतात. पण यंदा करोनाचं सावट असताना आणि बेकारीची कु-हाड कोसळली असताना त्यांना जर या राजकारणी मंडळींनी काही रक्कम दिली तर त्यांना मदतच होईल.