आशालताताई यांच्या एक्झिटने अवघ्या मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. सर्वांना सुन्न करत ताई निघून गेल्या. आई माझी काळूबाई या मालिकेच्या शूटींगदरम्यान साता-यातच आशालताताईंना करोनाची लागण झाली. त्यातच त्यांची परिस्थिती बिघडल्याने त्यांना व्हेंण्टिलेटरवर ठेवण्यात आले आणि मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
आई माझी काळूबाई मालिकेत काळूबाईंच्या व्यक्तिरेखीतील प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल त्यांच्यासोबत या संपूर्ण काळात सतत होत्या. एका आघाडीच्या वृत्तपत्रासोबत अलका कुबल भावनाविविश होत या दु:खद घटनेबद्दल व्यक्त झाल्या.
अलका कुबल सांगतात, “गेली अडीच महिने ‘आई माझी काळूबाई’ मालिकेचं शूटींग आम्ही साता-यात करतोय. शूटींगला सुरुवात करण्यापूर्वीच आम्हा सर्वांच्या करोना चाचण्या पार पडल्या. यातच आशालता ताईंचीसुध्दा झाली होती. चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच आम्ही आनंदात शूटींगचा श्रीगणेशा केला. “
“आशालताताई सतत स्वत:ची काळजी घ्यायच्या. त्यांना कुठलेच आजार नव्हते किंवा कुठली गोळी सुरु नव्हती. परंतु या करोना महामारीत त्यांना प्राण गमवावं लागणं खुप धक्कादायक आहे. आमच्या टीमच्या 22 जणांना करोनाची लागण झाली, हे खुपच धोकादायक होतं. परंतु ते तरुण असल्याने उपचारानंतर लगेच ठणठणीत बरे झाले. “
अलका कुबल यांना अश्रू अनावर होत त्या सांगतात, “गेली 35 वर्षे माझ्यात आणि आशालता ताई यांच्यात मायलेकीचं घट्ट नातं होतं. खुप कामं एकत्रं आम्ही केली आहेत. त्या नेहमी लहान मुलासारख्या हे हवं ते हवं असा हट्ट करायच्या. आम्ही त्यांचे सर्व लाड पुरवायचो. त्यांना वाचविण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. मी पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेले होते. डॉक्टरांच्या साथीने आम्ही त्यांना वाचविण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांना वाचवू शकलो नाही ही खंतच आयुष्यभर राहील. त्यांचं जाणं चटका लावून गेलं. परंतु त्यांचे हट्ट आम्ही पुरवू शकलो याचं समाधानसुध्दा आहे.”
(Source -esakal )