अभिनेत्री सायली संजीव ही 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर सायली जरी मराठी सिनेमांमध्ये मोठ्या दिमाखात झळकत असली तरी तिच्या चाहत्यांसाठी पुन्हा आनंदाची वार्ता आहे. सायली आजपासून म्हणजेच 28 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ते 'शुभमंगल ऑनलाईन' या नव्या मालिकेतून.
ह्या नव्या को-या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सायली मालिकेविषयी उत्साहात बोलताना सांगते, "ही मालिका आपल्यापैकी प्रत्येकाला रिलेट करणारी आहे. खास करुन आजच्या डिजीटल युगातल्या जोडप्याची ही गोष्ट आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे या लॉकडाऊन दरम्यान ज्यांची ऑनलाईन लग्न जुळली आहेत, त्यांना तर ही आपलीच कहाणी वाटेल यात शंका नाही."
सायलीला तिच्या आणि सुयशच्या केमिस्ट्रीविषयी विचारल्यावर ती म्हणाली, "पहिल्यांदाच एकत्र काम करतोय असं बिलकुल वाटत नाही. आम्ही ऑफस्क्रीनसुध्दा खुप मजा करतो. आमची प्रत्येकाची व्यक्तिरेखा एकमेकांचं काम खुलवायला मदत करते. त्यामुळे तुम्हा सर्वांना ही मालिका पाहायला खुप मजा येईल. "
शर्वरी आणि सायलीमध्ये काय साम्य आहे असा प्रश्न केल्यावर सायली क्षणार्धात हसून उत्तर देते दोघीही एकसारख्या आहेत. जे लोकं मला वैयक्तिकरित्या ओळखतात ते आता मालिका सुु झाल्यावर हेच म्हणणार आहेत की, सायली तिची ख-या आयुष्यातली व्यक्तिरेखाच पडद्यावर साकारतेय.
शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे गोड नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं... यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत सर्वांना अनुभवता येईल येत्या सोमवारपासून भेटीला येणा-या 'शुभमंगल ऑनलाईन' या नव्या मालिकेत.
शंतनूच्या भूमिकेत सुयश टिळक आणि शर्वरीच्या भूमिकेत सायली संजीव ही फ्रेश जोडी या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर एकत्र येतेय. सायलीचा नवराई रुपातला हा गोड फोटो नुकताच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच अभिनेता आणि या मालिकेचा निर्माता सुबोध भावे या मालिकेसाठी खुप उत्सुक आहे.