बुर्रूम बुर्ऱुम म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. पांडू सिनेमातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. पण एका गाण्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘दादा परत या ना’ असं या गाण्याचे बोल आहेत. अवधूत गुप्तेने या गाण्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अवधूत आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘दादा.. हे गाणं मी लिहिलेलंच नाही. तुम्हीच लिहून घेतलंय! नाहितर असं एकटाकी माझ्याकडून येणं शक्यच नव्हतं! जेव्हा हे लिहीलं तेंव्हा पासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा हे ऐकतो, तेव्हा तेव्हा तुमचं अस्तित्व मला आजूबाजूला जाणवतं! तुमचा पाठीवरुन फिरणारा शाबासकीचा हात अंगावर काटा आणतो!
असो! तुम्ही जिथे असाल तिथल्या लोकांची तर मज्जाच आहे बुवा!! पण थोडा आमचाही विचार करा ना! आम्हालाही पुन्हा .. दर्शन द्याना!! असं आडून आडून माझ्याकडून काय लिहून घेताय? स्वतः या .. आणि स्वतःचं स्वतः लिहा ना!! दादा परत या ना... हसवा ना..!