मनोरंजन सृष्टीत काम करताना प्रत्येक कलाकाराला आपला संघर्ष करत असताना काही कटू प्रसंगांना समोरे जावे लागते. अश्याच काही कटू प्रसंगाची एक आठवण अभिनेत्री
अर्चना नेवरेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली.
प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा तळवलकर त्यांच्या युट्युब चॅनलवरून इंडस्ट्रीतील कलाकरांच्या मुलाखती घेतात. यात त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अर्चना नेवरेकर यांनी शाळेत असताना निलकांती पाटेकर आणि सुलभा देशपांडे यांच्या नाटकात बालकलाकार म्हणून अभिनय केला होता. सिनेसृष्टीत अगदी छोटी छोटी पात्र साकारत त्या मराठी सिनेसृष्टीत चांगल्या स्थिरस्थावर झाल्या होत्या. यादरम्यान त्यांना चांगली ओळख निर्माण झाली असताना एका हिंदी चित्रपटासाठी त्यांची निवड झाली होती. मात्र 'या चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल.' अशी अट घातली गेली होती. असं खळबळजनक वक्तव्य अर्चना यांनी केलं.
अर्चना नेवरेकर याविषयी बोलताना म्हणाल्या, "या चित्रपटासाठी दोन मुलींची निवड झाली होती. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. पण या चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल." अशी अट त्यांनी घातली.
"त्यावेळी माझ्यासोबत ज्या दुसरी मुलीची निवड झाली होती, तिने ती मान्य केली आणि ती आजच्या घडीला टॉपला आहे. ती आपल्याच बॅचची मुलगी आहे. पण मी मात्र ती नाकारली. ही लोकं एक समज करुन घेत असतात की अशाप्रकारच्या पार्श्वभूमीतून आलेल्या मुली या आपल्यासाठी सहज उपलब्ध असतात. एखादी गरीब मुलगी लबाडच असते, असा समज त्यांचा असतो."
पुढे अर्चना नेवरेकर म्हणतात, "ही समस्या मला आणि सुप्रियाला अनेकदा आली आहे. पण सुप्रिया ही फार खंबीर होती. ती कोणाला थोबाडीत द्यायलाही घाबरायची नाही", असेही त्यांनी सांगितले.
अर्चना नेवरेकर यांनी मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने मराठी सिनेसृष्टीत त्यांची स्वतःची ओळख बनवली आहे. 'ती फुलराणी', 'जन्मदाता', 'स्वप्न सौभाग्याचे', 'सुना येती घरा', 'वहिनीची माया' अशा विविध नाटकात आणि सिनेमांत काम करत त्यांनी आपलं नाव कमावलं आहे.