लाइट.. कॅमेरा.. अॅक्शनचा झगमगता खेळ पुन्हा रंगणार आहे. करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याचे संकेत दिले. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठकीत चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाने रविवारी निर्णय जाहीर केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास सशर्त मान्यता देण्यात आली आहे.
शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीपूर्वीची आणि नंतरची कामे करता येतील, असे नमूद करण्यात आले आहे. नियमांनुसार चित्रीकरण न झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.