बॉलिवूडला नेहमीच दर्जेदार सिनेमा देणा-या राजश्री प्रोडक्शनने 'प्रेम रतन धन पायो' सिनेमानंतर कुठल्याच सिनेमाची घोषणा केली नव्हती. पण राजश्री प्रोडक्शनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच एक छोटासा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांची 58 वी कलाकृती लवकरच प्रेक्षकांसमोर सादर करत असल्याची वर्दी दिली आहे.
तीन वर्षांनंतर राजश्रीने ‘हम चार’ या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमासुध्दा त्यांच्या आत्तापर्यंतच्या 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' यांसारख्या कौटुंबिक कहाणीवरच आधारित असल्याची माहिती मिळतेय. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक दीक्षित करणार आहे.
या सिनेमाबाबत बोलताना दिग्दर्शक अभिषेक म्हणतो, “‘हम चार’ हा सिनेमा मैत्रीवर आधारित आहे. एकत्र कुटुंबाची संकल्पनाच नाहीशी होत चालली आहे, म्हणूनच त्याचं महत्त्व यात पटवून देण्यात येणार आहे. माझ्यावर हा विश्वास दाखविल्याबद्दल राजश्री परिवार आणि सूरज बडजात्या यांचे विशेष आभार.”
https://www.instagram.com/p/BqEpVuNnzMm/
पुढील वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे 2019 रोजी ‘हम चार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण नेहमीप्रमाणे या सिनेमातही सलमान खान नायक असेल तर नवल वाटायला नको.