सिनेसृष्टी गाजवणारे संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्या अडचणी संपण्याची काहीच चिन्हे दिसून येत नाहीत. प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा़ यांच्यावर 20 वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारप्रकरणी आलोकनाथांची अंतिम जामिनाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसंच याप्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टाने आपला निर्णय 26 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.
आलोकनाथ यांच्यावर कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. आलोकनाथ आत्तापर्यंत कधीच हजर राहिलेले नाहीत.निर्मात्या विनता नंदा यांच्यावरील 20 वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणा-या ओशिवरा पोलिसांनी अनेकवेळा आलोकनाथ यांना समन पाठवले होते. पण ते कधीच हजर झाले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनीसुध्दा याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
ओशिवरा पोलिसांनी आलोकनाथ यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र अद्यापपर्यंत आलोकनाथ यांना अटक करण्यात आलेली नाही.विनताच्या आरोपानंतर संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी ,रेणूका शहाणे या बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्याविरोधात आवाज उठवला होता.
काय होती विनता नंदाची फेसबुक पोस्ट
विनताने लिहलं होतं, “आलोकनाथ यांची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमचा खुप मोठा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही जवळपासच राहत होतो. त्यावेळेस मी दूरदर्शनवरील नंबर वन शो ताराची निर्मिती व लेखनही करत होती. ते माझ्या शोमधील नायिकेमध्ये बरेच इंटरेस्टेड होते, पण ती त्यांना धुडकावून लावत होती. त्यावेळेस ते टीव्हीचे स्टार असल्याने नेहमीच उद्दामपणाने वागत.एकदा त्यांनी त्या नायिकेबरोबर एवढी असभ्य वर्तवणूक केली की तिने त्यांना सर्वांसमोर जोरदार कानाखाली लावून दिली.
विनता पुढे सांगते, पण मोठा अभिनेता असल्याने आलोकनाथ यांच्या बेताल वागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जायचं. माझ्याबरोबरसुध्दा त्यांनी खुप असभ्य वर्तवणूक केली आहे. एकदा एका पार्टीत त्यांनी माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून माझ्यावर बलात्कार केला.