बॉलिवूडच्या काही हॅण्डसम चेह-यांमध्ये शाहिद कपूरच्या नावाचा समावेश होतोच. शाहिदने आजपर्यंत अनेक चांगले सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. पण काही सिनेमांमध्ये मात्र तो चमक दाखवू शकला नाही. शाहिदला आजही त्या सिनेमांच्या निवडीचा पश्चाताप होताना दिसत आहे. शाहिदने झूम वाहिनीच्या शोमध्ये या निर्णयांमागची खंत बोलून दाखवली. शाहिद म्हणतो, ‘मला संधी मिळाली तर ‘शानदार’ सिनेमाला मी माझ्या करीअरमधून काढेन. केवळ मी आहे म्हणून एखादा टुकार सिनेमा चालेल असं होत नाही. मी माझ्या फॅन्सना कायमच धन्यवाद देतो. माझी काही सिनेमांची निवड चुकली हे मान्य करतो.’
२०१५मध्ये रिलीज झालेल्या ‘शानदार’ला शाहिद कपूर, आलिया भट आणि पंकज कपूर अशी तगडी स्टार कास्टही अपयशापासून वाचवू शकली नव्हती. त्यानंतर आलेल्या ‘उडता पंजाब’ ने शाहिदला दिलासा दिला खरा पण ‘बत्ती गुल मीटर चालू’ने पुन्हा एकदा त्याला अपयशाचं तोंड पहावं लागलं होतं. नुकताच रिलीज झालेल्या ‘कबीर सिंग’ला मात्र चांगली ओपनिंग मिळाली आहे. या सिनेमात व्यसनात बुडालेला आणि थोडा विक्षिप्त असा सर्जन शाहिद कपूरने रंगवलेला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा आडवाणीही आहे.