अक्षय कुमार सध्या ‘मिशन मंगल’च्या यशाचा आनंद घेत आहे. चाहते आणि समीक्षक दोघांकडूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण असं असलं तरी अक्षय त्याचं समाजभान अजिबात विसरलेला नाही. त्याने काही दिवसांपुर्वीच सांगली-कोल्हापुरच्या पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला होता. आता तो आसामच्या पुरग्रस्तांसाठी मदतीला आला आहे.
अक्षयने आसाममधील मुख्यमंत्री पुरग्रस्त निधीसाठी 1 कोटी आणि काझीरंगा अभयारण्यासाठी 1 कोटी दिले आहेत. यावर अक्षय म्हणतो ‘देवाच्या आशिर्वादाने मला उत्तम पैसे मिळतात. इतके पैसे घेऊन मी तरी काय करणार आहे?’ अक्षय पुढे म्हणतो, ‘आसाममधील पुराच्या फोटोंनी मी आतून व्यथित झालो आहे. मला एका फोटोने अस्वस्थ केलं यात एक आई तिच्या मुलाला खांद्यावर बसवून पुर पार करत होती. यावेळी चेह-यावर कोणतंही दु:ख, कोणताही तणाव नव्हता. हा फोटो पाहून मला वाटलं हे माझ्यासोबत देखील होऊ शकतं. आपल्याला या लोकांना जरूर मदत करायला हवी.’
अक्षय सध्या गुडन्युज आणि सुर्यवंशी सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे.