गरजू आणि संकंटात असलेल्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे करणा-या बॉलिवूडकरांमध्ये भाईजान सलमान खान नेहमीच अग्रेसर असतो. त्याच्या मोठ्या मनाचा नेहमीच प्रत्यय आल्याच्या अनेक घटना आपल्याला माहिती आहेत. नुकतंच या दबंग खानने पुन्हा एकदा आपल्या मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्रातील एक पुरग्रस्त गाव दत्तक घेण्याचा त्याने निर्णय घेतला आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव तो दत्तक घेत आहे.
गेल्यावर्षी आलेल्या पुरामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हाहाकार माजला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरमध्ये देखील होत्याचं नव्हतं झालं होतं. या पुरामध्ये वाहून गेलेली आणि मोडून पडलेली घरं पुन्हा बांधण्याचा निर्णय सलमान खान याने घेतला आहे. सलमान खान फिल्म्स आणि एलान फाउंडेशनकडून पूरग्रस्त भागात पक्की घरे बांधण्यात येणार आहेत.
तज्ज्ञ, राज्य सरकार, स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच गुंतवणूकदारांच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात घरबांधणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. संपूर्ण गावाचा व्यापक विकास करण्याचा दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.