आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे व यंत्रणांवरचा ताण हलका करायचा आहे.
तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यांचीसुध्दा काळजी तितकीच महत्त्वाचं असल्याचं बॉलिवूडच्या एक्शनपटांचा राजा दिग्दर्शक रोहित शेट्टीने दाखवून दिलं आहे. ऑन-ड्युटी पोलिसांसाठी रोहित शेट्टीने शहरात आठ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. त्याच्या या मदतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.रोहितच्या या कार्याला सर्वच स्तरांतून सलाम केला जात आहे. खरचं कौतुकास्पदच आहे.
#RohitShetty has facilitated eight hotels across the city for our on-duty #CovidWarriors to rest, shower & change with arrangements for breakfast & dinner.
We thank him for this kind gesture and for helping us in #TakingOnCorona and keeping Mumbai safe.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 21, 2020
या हॉटेल्समध्ये ऑन-ड्युटी पोलिसांना थोडा वेळ आराम करता येणार आहे. तसंच अंघोळ किंवा कपडे बदलण्यासाठीही हे हॉटेल्स त्यांना वापरता येईल. तेथे त्यांना नाश्ता व जेवणसुद्धा देण्यात येणार येईल. करोना व्हायरसशी लढण्यात आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यात आम्हाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत मुंबई पोलिसांनी ट्विट केले आहेत.
रोहितने सिंघम, सिंबा असे तुफान सुपरहिट पोलिस ड्रामा सिनेमे प्रेक्षकांसाठी आणले आहेत तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी अक्षय कुमार स्टारर सिनेमा प्रदर्शनासाटी सज्ज असतानाच करोना संकंट राज्यावर ओढवलं. त्यामुळे पोलिस व रोहित शेट्टी हे समीकरण तसं जुनंच.