करोना संकट आणि लॉकडाऊन यासोबतच हे वर्ष सिनेविश्वासाठी बरंच दु:खदायक ठरलं. अनेक नामवंत कलाकारांना आपण यंदा गमावलं. मराठी सिनेविश्वाचंसुध्दा यंदा बरंच नुकसान झालं. आपण अनेक प्रसिध्द कलाकारांना गमावलं आहे. जरी ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांनी सिनेसृष्टीला दिलेलं अमूल्य योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांचं काम त्यांच्या भूमिका कायमच रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहतील.
आशालता वाबगावकर
माहेरची साडी सिनेमातील कजाग सावत्र आईच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झाल्या. इतकंच नाही तर त्यांनी अनेक मराठी सिनेमांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली. ब-याच वर्षानंतर अनलॉकमध्ये अलका कुबल यांची निर्मिती आणि महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या आई माझी काळूबाई या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. परंतु दुर्देवाने या मालिकेच्या सेटवर त्यांना करोनाची लागण झाली. आणि वयोमानानुसार करोनाशी त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
निशिकांत कामत
मराठीसोबतच बॉलिवबूड गाजवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाने अवघ्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांचं अकाली जाणं मनाला चटका लावून गेलं. ते ५० वर्षांचे होते. क्रॉनिक लिव्हर डिजीजचं संक्रमण वाढल्याने त्यांना हैद्राबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्यात सुधारणा न झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मराठीतले डोंबिवली फास्ट, लय भारी तर बॉलिवूडचे मुंबई मेरी जान, रॉकी, दृष्यम यांसारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले.
रवी पटवर्धन
ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह संपूर्ण कालाविश्व हळहळलं . गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून रसिकांचं मनोरंजन केलं. अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका साकारत या वयातही रसिक प्रेक्षकांवर अपल्या अभिनयाचं गारुड केलं.
रत्नाकर मतकरी
मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांची यंदा प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण नाट्य आणि साहित्य विश्वावर शोककळा पसरली.
मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.
चंद्रकांत गोखले
अष्टपैलू अभिनेते विक्रम गोखले यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे २० जुन २०२० रोजी निधन झाले. चंद्रकांत गोखले प्रदीर्घ आजाराने ग्रासले होते आणि रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते साधी माणसं, सुहाग रात, रावसाहेब आणि लोफर यासारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखले जातात. दूरदर्शन टीव्हीवरील विविध कार्यक्रमानमधून या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं.
आशुतोष भाकरे
आशुतोषच्या निधनाने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला धक्काच बसला. ता नैराश्यात येऊन आशुतोषने आत्महत्या केली. भाकर आणि ईचार ठरला पक्का या मराठी चित्रपटांमधील महत्त्वपूर्ण भूमिकेत तो झळकला होता. प्रसिध्द मराठी अभिनेत्री मयूरी देशमुख हीचा तो पती आहे. अनेक दिवसांपासून आशुतोष ग्रासला होता. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आशुतोषने काहीच दिवसांत फेसबुकवर आत्महत्या कशी करावी याचा व्हिडीओ शेअर केला होता.
जयराम कुलकर्णी
मराठी चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी मार्च २०२० दरम्यान अखेरचा श्वास घेतला. पुण्यात वृद्धापकाळामुळे या ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झालं. ते ८८ वर्षाचे होते. पोलिस कमिशनरच्या भूमिकांसाठी ८०-९० च्या दशकांत ते प्रसिध्द होते. बनवा-बनवी , झपाटलेला, थरथराट सुपहिट सिनेमांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. . ते टेलिव्हिजनवर बऱ्यापैकी सक्रिय होते. प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचे ते सासरे होते.
कमल ठोके (जिजी-लागिरं झालं जी )
लागीर झालं जी फेम प्रसिद्ध अभिनेत्री कमल ठोके यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. जिजी म्हणून त्या महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रसिध्द होत्या. आरोग्याच्या काही समस्येने त्रस्त असलेल्या या अभिनेत्रीचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. बंगलोर च्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. लागीर झालं जी मालिकेतील सर्वच कलाकारांसोबत त्याचं खुप छान बॉंन्डींग असल्याचं नेहमी पाहायला मिळालं.
छगन चौगुले
नवरी नटली फेम ज्येष्ठ कलाकार छगन चौघुले यांचं उपचारादरम्यान यंदा त्यांचं निधन झालं. ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचं काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ या ध्वनिमुद्रिका विशेष गाजल्या. पण ‘खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. छगन चौगुले यांनी लोककलेचे कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. तरीही स्वयंःकौशल्याच्या जोरावर लोककलावंत म्हणून ते लोकप्रिय झाले.
अविनाश खर्शीकर
हदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांची प्राणज्योत मालवली. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं.
अविनाश खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकाहून एक अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, माझा छकुला, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’ या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.
राजा मयेकर
तब्बल ६० वर्षे रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांनी यंदा जगाचा निरोप घेतला. त्यांनी दशावतारी नाटकांच्या माध्यमातून रंगभूमी गाजवली. यानंतर नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या माध्यमांमध्ये त्यांनी स्वच्छंदपणे मुशाफिरी केली.
'आंधळं दळतंय', 'यमराज्यात एक रात्र' , 'असूनी खास घरचा मालक', 'बापाचा बाप', 'नशीब फुटकं सांधून घ्या', 'कोयना स्वयंवर' या लोकनाट्यांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय, दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. व्यावसायिक रंगभूमीवरही राजा मयेकर यांनी आपली चमक दाखवली. 'गुंतता हृदय हे', 'सूर राहू दे' ,'गहिरे रंग', 'श्यामची आई', 'धांदलीत धांदल', 'भावबंधन', 'एकच प्याला', यातील त्यांच्या भूमिका दगाजल्या.