काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने सध्या महाराष्ट्रात अनेक क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. थिएटर सुरु नसल्याने मनोरंजनाची भिस्त सगळी मालिकांवरच होती.
त्यामुळे अनेक नव्या मालिकांचा श्रीगणेशा या दरम्यान झाला. अनेक नव्या विषयांवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. विशेष म्हणजे अनेक सिनेता-यांनीही यावेळी मालिकांमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळेच मालिकांना खास असा प्रेक्षकवर्गही मिळाला. पाहुयात कोण कोणते आहेत हे कलाकार.....
सुबोध भावे: या लॉकडाऊनमध्ये सुबोध भावे ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. श्रीधर काळेचा छद्मीपणा, कपटीपण यामधून सुबोधचा अनोखा अंदाज पाहण्यास मिळाला. निगेटिव्ह व्यक्तिरेखा असलेली ही सुबोधची दुसरी मालिका होती. यापुर्वी ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती.
नीना कुळकर्णी : राजा शिवछत्रपतीनंतर नीना आता स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी साकारलेल्या करारी जिजाऊ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
भरत जाधव: केदार शिंदे आणि भरत जाधव या जोडीने पडद्यावर कायमच धमाल उडवून दिली आहे. आताही ही जोडी ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या निमित्ताने भरतही ब-याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर दिसला.
सिद्धार्थ चांदेकर : ‘जीवलगा’ या रोमॅंटिक मालिकेनंतर सिद्धार्थ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चमकला. या लॉकडाऊनमध्ये सिद्धार्थची ‘सांग तू आहेस का’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
मुक्ता बर्वे- उमेश कामत: लग्न पहावे करून या सिनेमानंतर उमेश कामत आणि मुक्ता बर्वे छोट्या पडद्यावर दिसण्यास सज्ज झाले आहेत. उमेश जवळपास सहा वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसतो आहे. मुक्ता यापुर्वी ‘रुद्र्म’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि अग्निहोत्र या मालिकेतील तिच्या कामाचंही कौतुक झालं होतं.