सुबोध भावे या नावाला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. मराठी सिनेमात सध्या ज्याचं नाणं अगदी खणखणीत वाजत आहे तो कलाकार म्हणजे सुबोध भावे.मलिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही प्रकरात सुबोधने त्याची खास ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला केवळ आवड म्हणून नाटकात काम करणारा अभियंता ते आजचा आघाडीचा कलाकार अशी सुबोधची ओळख आहे.
सुबोध सुरुवातीला नोकरी सांभाळत नाटकांमध्ये काम करत असे. पण अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग सुबोधने नोकरीचा राजीनामा देत मुंबईची वाट धरली आणि मराठी सिनेमाला आणखी एक नायक मिळाला.
पण सिनेमाची कोणातीही पार्श्वभूमी नसलेल्या सुबोधला हा मार्ग इतका सोपा नव्हता. सुरुवातीला नाटकांमधून काम केलं. त्यानंतर अवंतिका, पिंपळपान, आभाळमाया, कळत नकळत, का रे दुरावा, दामिनी, या गोजिरवाण्या घरात, यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.
याशिवाय वीर सावरकर, लालबागचा राजा, पाऊलवाट, सनई चौघडे, मिशन चॅम्पियन, हृदयांतर अशा सिनेमांनी त्याची ओळख बनवली. पण सुबोधमधील अभिनेत्याला अजून काहीतरी आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारायची होती.
सुबोधच्या कट्यार काळजात घुसली सिनेमातील सदाशिवच्या व्यक्तिरेखेने रसिकांची वाहवा मिळवली. यानंतर सुबोध समोर आला तो बालगंधर्व सिनेमातून. सुबोधच्या राजस व्यक्तिमत्त्वाला बालगंधर्वाच्या स्त्री वेषात चार चांद लागले. यानंतर लोकमान्य - एक युगपुरुष सिनेमांमधून सुबोधने लोकमान्य टिळकांचं करारी व्यक्तिमत्त्व साकारलं.
यानंतर सुबोधच्या वाट्याला पुन्हा एकदा बायोपिक आला. मराठी सिनेमातील सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांची व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखेने सुबोधच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम व्यक्तिरेखा साकारण्याचं समाधान त्याला मिळालं असावं. कारण या सिनेमातील सुबोधच्या अभिनयावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.
प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवणा-या या अभिनेत्याला पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....