By  
on  

एका सत्याने पणाला लागणार का संजीवनीचं आयुष्य?

आयुष्य म्हटलं की नाते संबंधाची कसोटी आलीच... ही कसोटी अग्नीवर तावून सुलाखून निघणार्‍या सोन्यासारखी असते. प्रतिकूल परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते असे म्हणतात… अशाच एका कसोटीला आपली संजु सामोरी जात आहे... जिथे तिचा संसार, आयुष्य, नाती सगळंच पणाला लागलं आहे. तसं बघायला गेलं तर संजु – रणजीत यांच्या प्रेमकथेची सुरुवात अपघाताने झाली.

तुम्हा आम्हा सगळ्यांच्या साक्षीने काही महिन्यांपूर्वी संजीवनी आणि तिचा फौजदार म्हणजेच रणजीत यांचं नातं जुळल, ते लग्न बंधनात अडकले. पण.....अतिशय अल्लड अशी संजु जिची खूप साधी स्वप्नं आहेत तिला लग्नानंतर अत्यंत लहान वयात जीवनाची खूप मोठी लढाई लढावी लागणार आहे या सत्यापासून ती अनभिज्ञ होती... ढाले पाटील यांच्या घरातील चालीरीती, नियम सांभाळताना ती हळूहळू संपूर्ण कुटुंबाचा आधार बनली. या खडतर प्रवासात तिने नवर्‍याचेच नाही तर सासूचे प्रेम आणि विश्वास देखील मिळवला.

पण इतकं करून देखील आपल्याच माणसाने घेतलेल्या एका निर्णयामुळे फुलपाखरासारखे आयुष्य जगणार्‍या संजीवनीसमोर एक प्रश्न कायम उभा राहिला... तो म्हणजे घराची प्रतिष्ठा आणि वडिलांकडून मिळालेल्या धमकीमुळे रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य... आणि ज्याची भीती तिला होती तेच घडणार आहे संजुच्या वयाचे सत्य रणजीत आणि ढाले पाटील कुटुंबासमोर लवकरच येणार आहे... तिचं सगळं आयुष्य यामुळे बदलणार आहे याची जाणीव तिला आहे... हे कळल्यानंतर संपूर्ण ढाले पाटलांची कुटुंबाची अब्रू या प्रकरणाने धुळीला मिळणार आहे.

.नक्की असे काय घडले ? जी चूक संजुकडून कोणाच्या तरी सांगण्यावरुन घडली त्या चुकीची माफी संजुला मिळेल ? या वादळापुढे संजुचा निभाव कसा लागेल ? कशी ती या उभ्या ठाकलेल्या संकटाला उत्तर देईल ? हे समजण्यासाठी मालिकाच पाहावी लागेल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive