'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका आता नवीन वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत येत्या काही भागात प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असून शिर्केपाटलांच्या घरात सर्वांसमोर नवीन सत्य उलगडणार आहे.
सध्या मालिकेत गौरी तिच्या खऱ्या रुपात परतली आहे. अनिल आणि मानसी यांना शिक्षा झाल्याचेही दाखवण्यात आलं आहे. दरम्यान शिर्केपाटील कुटुंबासमोर आणखी एक धक्कादायक सत्य समोर आल्याचं मालिकेच्या प्रोमोतून समोर आलं आहे. ज्यात अम्मा शिर्केपाटलाच्या घरातील मोठं सत्य सगळ्यांना सांगणार आहे.
शिर्के पाटलांच्या घरातील अम्मा या घरच्या नसूनही अगदी घरातल्या व्यक्तीसारख्या आहेत. याच अम्मा शिर्केपाटलाच्या घरातील मोठं सत्य सगळ्यांसमोर उलगडताना दिसणार आहेत.
रंगनाथ हा गौरीचा पाठलाग करून गौरीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. गौरी त्याला चोर समजते आणि आरडाओरड करते. तेवढ्यात रंगनाथ गौरीच्या कानात काहीतरी पुटपुटतो आणि तिथून पळ काढतो. त्याने घेतलेलं अम्माचं नाव ऐकून, या प्रकरणाशी अम्माचा नक्कीच काहीतरी संबंध असावा, असा अंदाज गौरी बांधते.
मालिकेच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोत जयदीप अम्माला सर्वांसमोर सत्य सांगण्याची विनंती करत आहे. त्यावर अम्मा सांगते की, 'जयदीप हा माई आणि दादासाहेबांचा मुलगा नसून तो सूर्यकांतचा मुलगा आहे. तर, गौरी ही दादा आणि माईंची पोटची मुलगी आहे'. हे सत्य ऐकून आता माई-दादांसह घरातील सगळ्यानांच मोठा धक्का बसणार आहे.
दरम्यान या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत तर मालिकेत आता पुढे नेमकं काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.