झी मराठी वरील 'तू तेव्हा तशी' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेतील सौरभ आणि अनामीकाची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकत आहे. निलच्या येण्याने मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट आला आहे. मालिकेत हितेनने दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा केल्याचे राधाला जेव्हा समजते तेव्हा ती हितेनवर प्रेम करून खूप मोठी चूक केल्याची कबुली देते.
मात्र निल हा सुरुवातीपासूचं राधावर प्रेम करायचा. त्यामुळे आता हितेन आणि राधा यांचा ब्रेकअप झाल्यामुळे निल खुश झाला आहे आणि आता सौरभ आणि अनामीकाच्या प्रेमकहाणी सोबत राधा आणि नीलची प्रेमकहाणी मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत निल हा सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करत असला तरी त्याचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांना आवडू लागला आहे.
मालिकेत निलची भूमिका स्वानंद केतकर याने साकारली असून स्वानंद केतकर हा मुंबईतच लहानाचा मोठा झाला. रामनारायण रुईया कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक राज्यनाट्य स्पर्धा तसेच एकांकिका मधून सहभाग दर्शवला. आणि या स्पर्धांमधून त्याने अनेक बक्षिसे देखील पटकावली आहेत. तसेच स्वानंदने कलाश्रय या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेमार्फत गायन स्पर्धा, म्युजिक वर्कशॉप, वारली आर्ट वर्कशॉप सारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. तसेच ‘आपली सोसल वाहिनी’ या सेगमेंटमधून अनेक मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
दरम्यान तू तेव्हा तशी ही स्वानंदची पहिलीच मालिका असून या मालिकेत तो सहाय्यक भूमिकेत असला तरी त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळते. आता मालिकेत अनामिका आणि सौरभच्या प्रेमकहाणीसोबतच राधा आणि नीलची प्रेमकहाणी खुलू लागली आहे.