'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून प्रकाशझोतात आलेले अभिनेते अरविंद धनू यांचं निधन झाल्याचे वृत्त येत आहे. अरविंद धनू ४७ वर्षांचे होते. मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांतून कामे केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद धनू हे सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती खालावली. त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा देखील झटका आला आणि यानंतर काही वेळाने त्यांचे निधन झाले.
अरविंद धनू हे आतापर्यंत अनेक मालिकांत झळकले आहेत. 'लेक माझी लाडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘क्राईम पेट्रोल’ यांसारख्या अनेक मालिकांत ते झळकले होते, तर काही मराठी चित्रपटांत देखील त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली होती. अरविंद धनू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.