स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून मालिकेत सतत वेगवेगळे ट्विट्स येत असतात. त्याचबरोबर घरावर आलेल्या संकटांना अरुंधती कशी सामोरी जाते हे प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतं.
'आई कुठे काय करते' मालिकेत नुकतीच यशची जेलमधून सुटका झाल्यानंतर आता कुठे सगळी परिस्थिती चांगली झाली होत असतान पुन्हा अरुंधती समोर एक नवीन संकट उभे राहत आहे. आता मालिकेत अरुंधती आणि अभिषेक यांच्यामध्ये नाराजी निर्माण होणार असून यामुळे अभिषेक आता देशमुखांचं घर सोडून जाण्यासाठी प्रयत्न करत आहे.
नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून यात यशच्या वाढदिवसानिमित्त सगळे केक कापत असताना अभिषेक मध्येच अनघाच्या अंगावर ओरडतो आणि अनघाला म्हणतो की, 'अनघा तुला चेकअपला यायला सांगितलं होतं ना, ते न करता तू या असंस्कारी माणसाचा वाढदिवस साजरा करत बसलीयस.' हे ऐकून अरुंधती संतापते. ती अभिषेकला म्हणते की, 'अभिषेक तू आता जे करतोयस तेही आमचे संस्कार नाहीत.'
त्यानंतर अभिषेक अनघाचा हात धरत आपण घर सोडून जाऊ असे म्हणतो. पण अनघा त्याच्यासोबत जाण्यास नकार देत 'मी माझ्या बाळाला याच घरात, याच संस्कारात वाढवणार आहे.' असे म्हणताना दिसते. दरम्यान अनघाच्या या निर्णयामुळे मालिकेत आता नेमकं काय घडणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.