स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे गौरी-जयदीप आई बाबा होणार याचा आनंद साजरा होत असतानाचा अचानक या सुखाला दृष्ट लागली आणि गौरीचा अपघात झाला. गौरी आणि तिचं बाळ सध्या मृत्यूच्या दारात आहे. या दोघांचाही जीव वाचावा यासाठी जयदीप कोल्हापुरच्या अंबाबाईला साकडं घालणार आहे. लोटांगण घालत तो देवीचं दर्शन घेणार आहे. यासोबतच जयदीपने मंदिराची साफसफाई करुन दिव्यांची आरासही केली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांचे पादत्राणेही सांभाळण्याचं काम जयदीपने केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या नवरात्री विशेष भागात हा रोमांचक प्रसंग पाहायला मिळणार आहे. जयदीप ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता मंदार जाधवने या प्रसंगासाठी विशेष मेहनत घेतली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन त्याने याआधीही घेतलं आहे. मात्र या पवित्र वास्तूत आपल्या मालिकेचं चित्रीकरण व्हावं ही त्याची इच्छा होती. देवीच्या आशीर्वादाने मंदारची ही इच्छा पूर्ण झाली आहे. शूटिंगच्या निमित्ताने का होईना देवीची सेवा करायला मिळाली ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे असं मंदार म्हणला. या विशेष भागाचं शूटिंग पहाण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांचं हे प्रेमच नवी ऊर्जा देते अशी भावना मंदारने व्यक्त केली.
या भागाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे देवीच्या रुपात अभिनेत्री निशा परुळेकरचही दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. याआधी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही निशाने देवी अंबाबाई साकारली होती. तेव्हा जयदीपची ही खडतर तपश्चर्या पूर्णत्वास जाणार का? आणि गौरी आणि तिचं बाळ सुखरुप घरी परतणार का हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.