यंदाचा इंडीयन आयडॉल चा १२वा सीझन ब-याच कारणांनी प्रचंड गाजतोय. गाणं आणि गाण्यासाठीची प्रतिभा नाही तर इतर कारणास्तव हा शो सतत चर्चेत असतो. कधी टीआरपीसाठी अवास्तव गरिबी दाखविण्यात येते किंवा मग शोच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतसुध्दा या शोबद्दल अनेक आरोप-प्रत्यारोप करतो. तर कधी जजेस आणि निर्मात्यांच्या वागणुकीमुळे या शोवर टीका केली गेली.
पण आता या शोचा होस्ट आदित्य नारायणमुळे पुन्हा हा शो चर्चेत आला होता आणिन वादाच्या भोव-यातही अडकला होता. आदित्यने शोच्या सुत्रसंचालनावेळी अलिबागबद्दल केलेल्या वक्तव्याने त्यावर जोरदार टीका केली गेली. त्यानंतर आता आदित्य नारायणने सोशल मीडियावरून माफी मागितली आहे.
आदित्य आपल्या ट्विटमध्ये माफी मागत म्हणतो, , “मला हात जोडून नम्रपणे अलिबागमधील लोकांची आणि माझ्या इंडियन आयडलमधील वक्तव्यामुळे दुखावलेल्या सर्वांची माफी मागायची आहे. कुणालाही दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. माझ्या स्वत:च्या त्या जागेशी, लोकांशी आणि मातीशी भावना जोडल्या गेल्या आहेत.”
काय होता वाद
आदित्यने ‘इंडियन आयडल १२’ या शो दरम्यान एका स्पर्धकाला गाणे संपल्यानंतर अलिबागवरुन टोला लगावला होता. त्यानंतर अमेय खोपकर यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला असून यापुढे अलिबागबद्दल असं काहीही म्हणशील तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन असा इशारा दिला आहे