तमाम देशवासियांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय पौराणिक मालिका ‘रामायण’ मध्ये ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारणारे आणि प्रसिध्दी मिळवणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतल्या अंधेरीमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृध्दापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आयुष्यातील शेवटचे क्षण आपल्या कुटुंबासोबत घालवावेत, अशी त्यांची इच्छा होती. रूग्णालयाप्रमाणेच सर्व व्यवस्था घरी करण्यात आली होती.
प्रसिध्द टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा हा चंद्रशेखर यांचा नातू. 96 व्या वर्षीसुध्दा त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे अशा आशयाची पोस्ट शक्तीने मागच्याच महिन्यात केली होती.
चंद्रशेखर यांनी सुरवातीला त्यांनी एक ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरवात केली. त्यानंतर ५० ते ९० च्या दशकात ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘बरसात की रात’, ‘कटी पतंग’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘नमक हलाल’, ‘डिस्को डान्सर’, ‘शराबी’, ‘त्रिदेव’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. 1998 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारली आणि ते घराघरात पोहोचले. ते या मालिकेतील सगळ्या ज्येष्ठ कलाकार होते.