गोव्यातील ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यासाठी निर्माता आणि अभिनेता जितेंद्र जोशीचं कौतुक केलं जात आहे. अभिनेता सुबोध भावेनेही या पोस्ट शेअर करत जितेंद्रचं अभिनंदन केलं आहे. सुबोध आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘जितू तू अत्यंत मनस्वी कलाकार आहेस ,माझा अत्यंत लाडका मित्र आणि अभिनेता.
जेव्हा जेव्हा मला काम करताना थोडी मरगळ येते आणि "तुझं" काम बघतो तेव्हा वाटतं की तुझ्यासारख काम करता यायला हवं.पुन्हा तुझ्या कामामुळे नव्याने हुरूप येतो. "गोदावरी" तुझी पाहिली निर्मिती आणि पहिल्याच प्रयत्नांत तू पुन्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि ऊर्जा घेऊन आलास. तुला या चित्रपटाने "सर्वोत्तम अभिनेता" आणि निखिल ला "सर्वोत्तम दिग्दर्शक" हे 'किताब मिळवून दिले आणि आम्हाला काम करण्याची नवी दिशा. तुझं ,निखिल च आणि "गोदावरी" च्या संपूर्ण संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तुझी वाटचाल कायमच प्रेरणादायी होवो या शुभेच्छा. खूप प्रेम आणि घट्ट मिठी