आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या जवळच्या आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेचं त्यांच्या मनात खास असं एक स्थान आहे. या मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक व्यक्तिरेखा म्हणजे अनिरुध्द देशमुख आपल्या पत्नीची गेली 12 वर्षे फसवणूक करणारा, तरीही बिनबोभाट आपण किती सज्जन आहोत म्हणून मिरवणारा पती साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांचा ही व्यक्तिरेखा खुलवण्यात सिंहाचा वाटा ठरतोय. पत्नी अरुंधतीचं आपल्याशिवाय पानच हलत नाही असा गोड गैरसमज करुन घेणारा आणि मग ती घटस्फोटानंतर स्वावलंबी झाल्यावर तिच्यावर मनातून जळणारा असा हा अनिरुध्द देशमुख मिलिंद गवळी यांनी हुबेहूब साकारला आहे.
नकारात्मक भूमिकेमुळे मिलिंद यांना अनेकांच्या शिव्या खाव्या लागत आहेत. मात्र प्रेक्षकांनी दिलेल्या शिव्यांचं आपल्याला वाईट वाटण्याऐवजी कौतुक वाटतं असं मिलिंद यांनी म्हटलंय. मिलिंद यांनी नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.
मिलिंद यांनी इन्स्टाग्रामवर मालिकेतील एक भाग पोस्ट केला आणि लिहिलं, 'दुसऱ्याचा विचार न करणारी आणि दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलणारी काही माणसं असतात. त्यातलाच हा अनिरुद्ध देशमुख. फारच उर्मट, धाकट्या भावाला वाटेल ते बोलणार, त्याच्या मनाला लागेल असं बोलणारा, फक्त चुका दाखवून द्यायच्या, मदत करायची नाही. अशी असंख्य माणसं असतात अनिरुद्ध सारखी या समाजामध्ये , बोलताना समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही, त्याची काय अडचण आहे ते समजून घ्यायचं नाही.