‘मुलगी झाली हो’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकतंच या मालिकेत माऊच्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले होते. या नंतर किरण माने यांनी आपल्याला राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून बाजूला केल्याचे म्हटले. तसेट कुठलीच पूर्वसूचना न देता कामावरुन काढून टाकल्याने त्यांच्या बाजूने सोशल मिडीयावर एक कॅम्पेनच चालवण्यात आला. अनेक कलाकारांचा किरण माने यांना या प्रकरणात पाठिंबा मिळाला. दरम्यान मालिकेच्या निर्मात्यांनी मात्र किरण माने यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे.
चॅनेलने या प्रकरणी म्हटलंय, “‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते किरण माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला नायिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे घेतला होता. अनेक सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांचा ते अनादर करायचे. या आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.”
“या तक्रारीनंतर किरण माने यांना अनेकदा समज देण्यात आली होती. पण, माने यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या या वागणुकीमुळे सेटवरील शिस्त आणि वातावरण बिघडू लागलं. त्यासोबत सहकलाकारांना, त्यातही महिलांना अवमानकारक वागणूक व त्रास होत असल्याने त्यांना या मालिकेतून काढून टाकम्यात आलंय.”
“आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करतो. पण त्यासोबतच आमच्या कलाकारांना, विशेषतः महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे,” असे जाहीर स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीतर्फे देण्यात आले आहे.