भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने अवघा देश शोकसागरात बुडाला. दादरच्या शिवाजी पार्क येथे दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीदींच्या निधनानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. लता मंगेशकर यांचं स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे यावरुन राजकारण पेटलं आहे. यावर प्रथमच लतादीदींचे बंधू ज्येष्ठ संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, “भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दीदी हिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छाच नाही. कृपया यावरुन राजकारण करु नये.”
पुढे ते म्हणाले, "ह्रदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने दीदीला लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापने करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केली आहे. दीदीचं संगीत स्मारक होतंय यापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक होऊ शकत नाही.”