मराठी चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. तसेच भरत जाधव हे नाटकाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. सध्या रंगभूमीवर त्यांच्या 'सही रे सही' या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. मात्र, नुकतंच नाट्यगृहामध्ये प्रयोग सुरु असताना असा काही प्रकार घडला, ज्यामुळे प्रेक्षकांसह अभिनेत्यानेही खंत व्यक्त केली आहे.
भरत जाधव हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. या सोशल मिडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहततात. नुकतीच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेयर केली. ज्यातून एक मोठा प्रश्न समोप आला आहे, तो म्हणजे मराठी नाट्यगृहांची दुरावस्था.
भरत जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चाहत्यांच्या काही ट्विट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. सोबतच "नाट्यगृह व्यवस्थपन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो" असं म्हणत खंतही व्यक्त केली आहे.
भरत जाधव यांच्या एका चाहत्याने ट्विट करत लिहिलंय, ''स्वानुभव भरत जाधव यांच्या 'सही रे सही'च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो. त्यावेळी नाटक मध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन करुन जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, तोपर्यंत प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक दीड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे आमच्या स्टेजवर चेहऱ्यावर हजार-हजार वॅटचे लाईट आहेत. आम्ही सुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली". असं म्हणत या चाहत्याने नाट्यगृहांची दुरावस्था समोर आणली आहे.
भरत जाधव यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. यादरम्यान त्यांची ही पोस्ट सुद्धा चर्चेत आली आहे.
यापूर्वीसुध्दा अभिनेत्री ऋजुता देशमुखने नाट्यगृहातील एसी बंद झाल्याने खोळंबलेल्या नाट्यप्रयोगाविषयीची पोस्ट केली होती. खरं खरं सांग या नाटकाचा प्रयोग सुरु असताना एसी बंद झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या प्रेक्षकांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत देण्यात आले होते.बराच गदारोळ माजला होता. यावर अभिनेता आस्ताद काळेनेसुध्दा व्हिडीओ शेयर करत आजच्या नाट्यगृहांची वस्तुस्थिती मांडली होती, वारंवार असे प्रकार समोर येत असल्याने रंगभूमीचा व कलाकारांचा अपमान होत असल्याची हळहळ व्यक्त होत आहे.