केदार शिंदे हे मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक आहेत. त्याचप्रकारे ते शाहीर साबळे यांचे नातू देखील आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे हे लवकरच त्यांचे आजोबा आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. केदार शिंदे हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावरून ते शाहीर साबळे यांचे काही किस्से, त्यांचे काही प्रसंग शेयर करत असतात. असाच एक शिवसेना स्थापना दिनानिमित्त केदार शिंदे यांनी शाहीर साबळे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जुना फोटो शेयर केला.
या पोस्टच्या कॅप्शन मध्ये असं म्हटलंय की, "आज शिवसेनेचा स्थापना दिवस...जून्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... ठाकरेकाका (बाळासाहेब ठाकरे) यांच बाबांना भेटायला आमच्या घरी येणं...बाबांच मातोश्रीवर वरचेवर जाणं... फोनवरुनही सतत चर्चा करणं..महाराष्ट्रभर आमच्या गाडीने दोघांनीच केलेला दौरा... पश्चीम महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या मोठमोठ्या नेत्यांच्या दहशतीला न जूमानता बाबांनी ठाकरेकाकांच्या ठीकठीकाणी भरवलेल्या सभा... शिवसेनेचा विचार ठामपणे तरुणांपुढे यावा म्हणून निर्माण केलेलं "आंधळं दळतयं" मुक्तनाट्य... जागृत झालेल्या मराठी तरुणांनी परप्रांतीयांविरुध्द पेटवलेली पहीली दंगल... बाबांचे आणि ठाकरे काकांचे ट्याप होणारं फोन संभाषण... दंगलीनंतर एका प्रसीध्द इंग्रजी दैनीकाने बाबांचा भलामोठा फोटो वर्तमानपत्रात छापून "बाळासाहेबांना गुमराह करणारा हाच तो रक्त पीपासू माणूस" म्हणून केलेली बाबांची नीर्भत्सना... शिवसेनेने राजकारणात पडू नये म्हणून बाबांनी केलेला आटापीटा... ऐशी टक्के समाजकारण आणि वीसटक्के राजकारण हे ब्रीद असलेल्या शिवसेनेच राजकारणातच सक्रीय होणं आणि बाबांच शिवसेनेपासून दूर होणं... आज हे सर्व आठवतय...''
त्यांनी पुढे लिहलंय, ''शेवटपर्यंत शिवसेनेलाच मत देणारे बाबा आणि शेवटपर्यंत साबळे कुटूंबावर प्रेम करणारे ठाकरेकाकाही आठवतायत... पण खंत एकच आहे की शिवसेनेचा इतिहास लीहीला जाईल तेंव्हा त्यात बाबांच्या योगदानाचा उल्लेख नसेल... मात्र बाबांना श्रध्दाजली वाहाताना उध्दव ठाकरे याचा उल्लेख करायला विसरले नाहीत हे ही कमी नाही...आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी आमच्या कुटुंबाबरोबर तसच स्नेहपुर्ण नात टिकवून ठेवलय...शिवसेना शतायु होवो...मराठी आणि शिवसेना हे समीकरण आबाधीत राहो... "जय महाराष्ट्र''. दरम्यान ही पोस्ट शाहीर साबळे यांच्या कन्या आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी लिहिली असून केदार शिंदेंनी ही पोस्ट शेयर केली आहे.