आषाढ महिना लागला की सर्वांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे आणि आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. विठुरायाच्या भेटीसाठी सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते अगदी सेलेब्रिटी लोकांना विठुरायाला भेटण्याची आस लागलेली असते. अशीच विठुरायाची आस अभिनेता जितेंद्र जोशीला लागली आणि तो दाखल झाला थेट विठुरायाच्या चरणी. काल देहू येथे तुकोबांची पालखी निघण्याआधी वारकऱ्यांना अन्नदान आणि तुकोबांच्या शिळा मंदिरात त्यांचं दर्शन घेण्याचं सुख जितेंद्र जोशीला अनुभवता आलं.
जितेंद्र जोशीने त्याच्या या वारीचे खास क्षण सोशल मीडियावर शेयर केले आहेत. हे फोटो शेयर करताना त्याने फोटोखाली पोस्ट करताना म्हटलंय, "काल श्री क्षेत्र देहू येथे तुकोबारायांची पालखी निघण्या आधी वारकऱ्यांना अन्नदान करण्याचं आणि तुकोबारायांच्या शिळा मंदिरात त्यांचं दर्शन घेण्याचं सद्भाग्या मला आणि माझा मित्र @nachiket_chidgopkar ला मिळालं. माझ्या आज्जीनं मला रोज विठोबा मंदिरात नेऊन माझ्यावर संस्कार केले आणि वारी पुण्यात आल्यावर मला दर्शनाला घेऊन जायची. काल तिची सर्वाधिक आठवण आली. ती असती तर तिला नक्की सोबत घेऊन गेलो असतो. अनेक मित्रांना सोबत न्यायचं होतं परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही. तुकोबांच्या चरणी त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
यापुढे जितेंद्र जोशी म्हणतो, "तुकोबांच्या चरणी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. कालचा अनुभव अविस्मरणीय होता. दीर्घकाळ स्मरणात राहतील अशा गोष्टींनी भरलेला आणि भारलेला!!
ज्ञानोबा माऊली तुकाराम!!"
दरम्यान जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी' या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून हा सिनेमा अनेक फेस्टिव्हल्स् मध्ये नावाजला गेला आहे. नुकताच जितेंद्र जोशी या सिनेमानिमित्त कान्स फिल्म फेस्टिव्हलला देखील जाऊन आला.