'मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांना बाहेर काढलं तर मुंबई, ठाण्यात, आजुबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही' असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया समोर येत असून राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी देखील जोर धरून आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांच्याया त्या वक्त्व्यावर ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली असून मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यानं देखील राज्यापालांच्या या वक्तव्यावर ट्वीट करत त्यांच्याविरोधात सूर काढला आहे.
कधी सावित्रीमाईंबद्दल बेताल वक्तव्य करायचं तर कधी मराठी माणसाला हिणवायचं! का?! कशासाठी?
मुंबई सगळ्यांना सामावून घेते, भेदभाव करत नाही त्या मुंबईचा आणि मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर काय बोलायचं?!
दुर्दैव दुसरं काय!— Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) July 30, 2022
दिग्दर्शक समीर विद्वांस हा नेहमीच राजकिय आणि सामाजिक प्रश्नांवर त्याची मतं व्यक्त करत असतो. अगदी मार्मिक किंवा बिनधास्त रोख धरत तो त्याची मते सोशल मीडियावर व्यक्त करत असतो. राज्यपालांच्या बेताल वक्तव्यावर समीरने ट्वीट करत म्हटले आहे की, "कधी सावित्रीमाईंबद्दल बेताल वक्तव्य करायचं तर कधी मराठी माणसाला हिणवायचं! का? कशासाठी? मुंबई सगळयांना सामावून घेते, भेदभाव करत नाही त्या मुंबईचा आणि मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर काय बोलायचं? दुर्दैव दुसरं काय!" अशी प्रतिक्रिया समीरने दिली आहे.
दरम्यान राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त समीर विद्वांस हा नेहमीच त्याच्या सिनेमातून सामाजिक प्रश्न मांडत असतो. त्याच्या या ट्विटवर अनेक नेटकाऱ्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.