मुंबई-ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही. मुंबईकडे पैसाचं उरणार नाही' असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यभरातून विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका झाली. अनेकांनी याचा निषेध करत नाराजी व्यक्त केली. राज्यपालांच्या या वक्तव्यावर मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी देखील एक पोस्ट शेयर करत राजकारण्यांवर निशाणा साधला आहे.
डॉ. गिरीश ओक यांनी फेसबुकवर पोस्ट शेयर करत असे म्हटले आहे की, "आई बाप भाऊ बहीण नसलेल्या मुलाची जी अवस्था होते त्याला उठ सूठ कोणीही उपरा काहीही बोलतो त्याच्या बाजूनी बोलणारं कोणीच नसतं तशी केवीलवाणी अवस्था करून ठेवलीये आपल्या महाराष्ट्राची ह्या राजकारण्यांनी."
"
"माझ्या मुला/मुली कडे कोणी वाईट नजरेनी बघू दे डोळे फोडून टाकीन.
वाईट बोलू दे जीभ हासडून टाकीन.
कोणी बोट दाखवू दे ते बोट छाटून टाकीन."
ही भावना होती महाराष्ट्र निर्मितीतल्या योध्द्यांची हुतात्म्यांची त्यांना आज काय वाटंत असेल.
आणि मराठीवर महाराष्ट्रावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या असंख्य मराठी माणसांना." अशी पोस्ट गिरीश ओक यांनी शेयर केली आहे.
त्यांच्या या फेसबुक पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रकारे अनेक कमेंट्स करत अनेकांनी गिरीश ओक यांच्या या पोस्टला पाठिंबा देखील दर्शवला आहे.