पुण्यातील एका कार्यक्रमात मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने पालक आणि विद्यार्थ्यी म्हणून आपण सर्वांनी वैयक्तिक विकासाच्या मागे धावाताना लायकी नसणारा राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम दिलं आहे, असं परखड मत व्यक्त केलं. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यातिथीनिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलताना सुबोध भावेने हे मत व्यक्त केलं.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त 'शतसूर्याचे तेज’ या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. सुबोधच्या उपस्थितीत ही नाटिका सादर करण्यात आली. यावेळी बोलताना सुबोधने सध्याच्या शिक्षण पद्धतीवर अप्रत्यक्षपणे भाष्य करत म्हटले की, "आपण सर्वजण चांगलं शिक्षण घेऊन करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशात जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत, आणि या अशा विचारसणीमुळे ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे, म्हणत सुबोधने आपली खंत व्यक्त केली. देश निर्मितीसाठी पुढील पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, असंही सुबोधने यावेळी म्हटले.
पुढे "इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावे, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच ‘मुंबई महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले तर पैसेच राहणार नाहीत’ अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात," असं म्हणत सुबोधने राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. त्याचबरोबर आपण मुलांना सिनेमातील गाण्यांवर नाचायला सांगण्याऐवजी, त्यातील संवाद म्हणायला लावण्याऐवजी या मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले, तर त्यांच्यात देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल," असा विश्वास सुबोधने व्यक्त केला.