स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील एका शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. यावेळी भाषणात सुबोध राष्ट्रीय शिक्षण, मुलांवरील संस्कार, राजकारण, राष्ट्रपुरुषांचं काम या सर्व मुद्द्यांचा उल्लेख करत तो व्यक्त झाला.
यावेळी 'लायकी नसणाऱ्यांच्या हाती आपण देशउभरणीचं काम दिलं आहे' या सुबोधच्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सुबोधच्या या भाषणातील विविध मुद्द्यांची सोशल मीडियावर चर्चा होत असतानाच आता त्याने संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
'आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची,’ असं लिहित सुबोधने जवळपास १६ मिनिटांचा हा व्हिडिओ त्याच्या फेसबुकवर पोस्ट केला आहे.
दरम्यान त्याच्या या व्हिडिओखाली अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘कलाकारांनी व्यक्त व्हायलाच पाहिजे. तुम्ही जे बोललात ते बोलायला देखील खूप धाडस लागतं. सुबोध भावे तुमचं मनापासून अभिनंदन,’ असं एकाने म्हटलंय. तर एकाने ‘योग्य बोललात, चुकीचं काही नाही. बाकीचं चुकीचं चाललंय, चुकीला योग्य म्हणण्याच्या काळातून देश जातोय सध्या,’ असं एकाने म्हटलं आहे.