मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन केले होते. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर आणि खलनायक स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
प्रदीप पटवर्धन यांच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. 'दिली सुपारी बायकोची', 'बुवा तेथे बाया', 'सखी प्रिय सखी', 'बायकोची खंत' यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाला अमाप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.
एका कार्यक्रमात 'मोरूची मावशी' यशाच्या शिखरावर असताना प्रदीप पटवर्धन हे त्या नाटकाची तिकिटे ब्लॅकने विकायचा असा एक किस्सा अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितला. यावर प्रदीप यांनी मी चांगली नोकरी करत असताना तिकिटं ब्लॅकने का विकेन आणि माझ्या एण्ट्रीने मोरुची मावशी नाटक सुरू व्हायचं. तर मी तिथे एण्ट्री घेऊ की खालती तिकिटं ब्लॅकमध्ये विकत बसू,' असं सांगत विजय पाटकर हे मस्करी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान प्रदिप पटवर्धन यांच्या अचानक निघून जाण्यानं मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.