मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोचलेले लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेते किरण माने. किरण माने सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे विविध मतं मांडत असतात. राजकिय भूमिका घेत असल्याचे कारण देत त्यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडिया आणि टिव्हीवर एकच गदारोळ मजला होता. त्यासंदर्भात पुन्हा एकदा एक पोस्ट शेयर केली आहे.
नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर करत झी मराठीचे आभार मानले आहेत. त्यासोबत त्यांनी अभिनेत्री अनिता दाते हिचेही कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिता दाते ही झी मराठीच्या बस बाई बस या कार्यक्रमात बोलताना दिसत आहे. यावेळी ती एखाद्या कलाकाराला तडकाफडकी काढून टाकण्यासंदर्भात भाष्य करत आहे.
दरम्यान किरण मानेंनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय की, "मालिकेतून काढणार्यांकडंन मला अचानक का काढण्यात आलं, या प्रश्नांची उत्तरं आजही नाहीत. म्हणूनच आजही हे 'विवेकी' मुद्दे मांडून त्यावर ठाम असनारी अनिता दाते ही महत्त्वाची आहे. ते एडीट न करता दाखणाऱ्या झी वाहिनीनं या मुद्याला न्याय दिलाय. अनिता गेली पंधरा वर्ष मला ओळखतेय. 'वाडा चिरेबंदी', 'गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या' या नाटकांत आम्ही एकत्र होतो. 'माझ्या नवर्याची बायको' मध्ये आम्हाला भाऊ-बहीण म्हणून महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यामुळं माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाही."
पुढे ते असं म्हणतात की, "अनिता सोबतच माझ्या पाठशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या प्राजक्ता केळकर, श्वेता आंबीकर, शीतल गीते यांचेही आभार. किरण मानेंनी आमच्यासोबत काहीही गैरवर्तन केलं नाही हे नॅशनल टीव्हीवर सांगायला कलावंताचा कणा लागतो." असं ते म्हणाले.
तर या प्रकरणाविषयी अधिक बोलताना अभिनेत्री अनिता दाते-केळकर असं म्हणाली की, "व्यवस्था समजून घेणं, व्यवस्थेला प्रश्न विचारणं, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीनं मांडता येणं ही खरंतर चांगली गोष्ट आहे असंच मी मानते. त्याबाबत किरण माने यांचं कौतुक आहे. एखादया व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणं हे चुकीचं आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो, चर्चा करू शकतो. मात्र त्याचं तोंड बंद करणं, त्याला धमकावणं, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचं लक्षण आहे."
दरम्यान किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.