By  
on  

'के दिल अभी भरा नही' नाटकाची २५० व्या प्रयोगाकडे वाटचाल

उतार वयातील जोडप्यांची भावनिक कथा मांडणारे नाटक मंडळी निर्मित 'के दिल अभी भरा नही' हे  विनोदी नाटक लवकरच २५० व्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल करत आहे. १९ मे रोजी बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे दुपारी ४ वाजता हा प्रयोग संपन्न होणार असून सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध जोड्या या वेळी उपस्थित राहणार आहेत. मंगेश कदम दिग्दर्शित आणि शेखर ढवळीकर लिखित या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

वयाची पन्नाशी गाठल्यानंतर नवऱ्या- बायकोत उडणारे छोटे, मोठे, आंबट, गोड खटके, इतकी वर्षं संसार केल्याने नात्यात आलेली परिपक्वता, सुखदुःखात एकमेकांना दिलेली साथ थोड्याबहुत प्रमाणात प्रत्येक घरात पाहायला मिळते. प्रत्येक घरातील या खऱ्या आयुष्याचा वेध घेणारे 'के दिल अभी भरा नही' हे नाटक म्हणूनच प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटते. नवराबायकोच्या उतारवयातील नात्यावर भाष्य करणारे हे नाटक या वयात एकमेकांसाठी आवश्यक असलेल्या भावनिक गरजेचे महत्त्वही अधोरेखित करणारे आहे.

 यशस्वी २५० वा प्रयोग पाचशेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने या नाटकाच्या सादरीकरणात काही बदल करण्यात आले आहेत. अर्थात नाटकाचा गाभा तोच असून प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार असल्याची खात्री नाटकाच्या संपूर्ण टीमकडून देण्यात आली आहे. लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या सहज, सुंदर अभिनयाने या नाटकाला चारचाँद लावले आहेत. याव्यतिरिक्त या नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांनीही दमदार अभिनय केला आहे

Author

Recommended

PeepingMoon Exclusive