आपल्या सुंदर अभिनयाने आणि वैविध्यपुर्ण भुमिकांमधुन मृण्मयी देशपांडेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'अग्निहोत्र' मालिकेतुन सुरु झालेला तिच्या अभिनयाचा प्रवास आता 'फत्तेशिकस्त' पर्यंत आला आहे. आता लवकरच मृण्मयी दिग्दर्शनाच्या नव्या भुमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शन करत असलेल्या पहिल्या सिनेमाचं नाव आहे 'मन फकिरा'. याविषयी एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मृण्मयी म्हणाली,"काॅलेजमध्ये असताना मी दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका म्हणुन बक्षीस मिळालं. तेव्हापासुन माझ्या डोक्यात दिग्दर्शनाचा विचार होता. परंतु पुढे अभिनय करायला सुरुवात केल्यानंतर दिग्दर्शनासाठी वेळ मिळत नव्हता. परंतु आता सिनेइंडस्ट्रीत रुळल्यानंतर आणि आत्मविश्वास आल्यानंतर मी आता दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे."
'मन फकिरा' हा नातेसंबंधावर भाष्य करणारा सिनेमा आहे. लग्न या संकल्पनेकडे आजची पिढी कशी बघते आणि त्यांचे त्याविषयीचे विचार काय आहेत, हा चौकटीबाहेरचा विषय 'मन फकिरा' द्वारे मृण्मयी देशपांडे प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. या सिनेमात अंकीता मोहन, सुव्रत जोशी, सायली संजीव आणि अंजली पाटील हे कलाकार झळकणार आहेत.