देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या घोषणेदरम्यान डॉक्टर नर्सेस, व इत अत्यावश्यक सेवा देणा-यांचं थाळीनाद करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन केल्यानंतर आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत. काल पुन्हा देशाला संबोधताना मोदी यांनी देशवासियांना येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री घरातील लाईट घालवून दिवे लावण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या या भाषणानंतर ते प्रचंड ट्रोल झाले.
आधी टाळ्या, थाळीनाद आणि आता दिवे लावायला सांगताय, देशावर काय संकट ओढवलंय आणि ह्याचं काय सुरुय. अशा अनेक टीका कालपासून सुरु झाल्या आहेत. नेटक-यांनी तर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस पाडला आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्यानंतर आता अभिनेता शशांक केतकरने मोदींना ट्रोल करणा-यांची चांगलीच कानउघडणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
शशांक सर्वांना विनंती करत म्हणतोय, ‘मंडळी नका सतत नावं ठेवू. नका सतत दोष काढू. दिवाळीत पणती लावतो तसंच फक्त ९ मिनिटं पणती, दिवा, मोबाईचा फ्लॅश लावायचा आहे. तुमच्या घरातच राहून, कँडल मार्च काढू नका’,
दरम्यान, मोदींच्या या दिवे उजळवा या नव्या उपक्रमाला विरोधकांसह संपूर्ण देशभरातून नाराजीचा सूर उमटला आहे. करोना संकटानविषयी ते काही महत्त्वाचे निर्णय घेतील अशी सर्वांना अपेक्षा होती किंवा सध्या देशात जी अस्वस्थता, नकारात्मकता पसरलीय ती दूर करण्याचा प्रयत्न करतील अशी आशा होती पण ती फोल ठरली. खरंतर त्यांनी देशाच्या वास्तववादी घटनाक्रमांवर बोलणं अपेक्षित होतं, पण त्यांच्या कालच्या भाषणातून त्यांनी देशवासियांची निराशा केली.