भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची आज २३ जुलै ही जयंती. बाळ गंगाधर टिळक असं त्यांचं संपूर्ण नाव. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रत्नागिरीतील चिखली या गावी झाला होता. ब्रिटिश राजवटीसह स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पहिल्या स्वातंत्रसैनिकांमध्ये त्यांची गणना होते. देशातील एक शक्तिशाली नेते, शिक्षक, समाज सुधारक आणि वकील अशी ओळख असलेले लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लोकप्रिय नेते होते.
मराठी सिनेविश्वातला आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने नुकतंच लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त सोशल मिडीयावरुन आदरांजली वाहिली आहे. सुबोध आणि लोकमान्यांचं एक कास नातं आहे, जे तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाही.
सुबोधने मोठ्या पडदयावर लोकमान्य टिळक आणि त्यांचे विचार जिवंत केले. लोकमान्य टिळक सिनेमाने अफाट लोकप्रियता मिळवली. ओम राऊत दिग्दर्शित लोकमान्या या सिनेमाने आजच्या पिढीला टिळकांच्या विचारांची शिकवण दिली.
‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी केली असे महत्त्वाचे पैलू अतिशय प्रभावी पद्धतीने या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ हा महत्त्वाचा ग्रंथ असेल किंवा रॅण्डच्या खुनामागील कटातील सहभाग असेल हे सारे प्रसंग टिळकांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत.
लोकमान्यांचे व्यक्तिमत्व किती उत्तुंग होते हे ठसविण्यात ह्या सिनेमाने बाजी मारत, प्रेक्षकांची मनं जिंकली.